सरकारमधून मोकळं करावे – फडणवीस
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये भाजपला जोरदार फटका बसला. महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत यश मिळवलं. महायुतीला १९ जागांवरच समाधान मानावं लागलं. या निकालावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचं आहे, मला सरकारमधून मोकळं करावे, अशी विनंती मी नेतृत्त्वाकडे करणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. मुंबईच्या अध्यक्षांनी स्वतः लक्ष घातलं. जो पराभव झाला त्याची सर्व जबाबदारी माझी आहे. सर्व जबाबदारी देवेंद्र फडणवीस स्वीकारत आहे. आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचं आहे, असं फडणवीसांनी म्हटलंय.
जनतेने दिलेले जनादेश माणून आम्ही पुढील तयारी करण्याचा निर्णय घेतला. ज्यांना जास्त जागा मिळाल्या, त्यांचं अभिनंदन करतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
काही ठिकाणी अँटीइंकबसी दिसली. काही ठिकाणी कांद्याचा प्रश्न होता. सोयाबीन आणि कापूस याचा देखील प्रश्न होता. सरकारने आरक्षण दिल्यानंतर एक नरेटीव्ह तयार केला त्याला आम्ही उत्तर देऊ शकलो नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भाजपला राज्यात लोकांनी नाकारले अशी परिस्थिती नाही. सम-समान मते मिळाली आहेत. आज आम्ही बसून निवडणुकीचा आढावा घेतला आहे. कोणते मुद्दे होते याचा आम्ही विचार केला, असं फडणवीसांनी सांगितलं.





