विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला शाळा जबाबाबदार-शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग..!!
मुंबई : बदलापूर येथील खाजगी शाळेत चिमुरड्यांवर घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आता शाळा व्यवस्थापनावर सोपविण्यात आली आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सुरक्षा रक्षक, तक्रार पेटी आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने यासंदर्भात मंगळवारी आदेश जरी केला आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सेवानिवृत्त न्यायाधीश साधना एस. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या सहअध्यक्षतेखाली विभागाच्या २६ सप्टेंबर २०२४ च्या शासन निर्णयान्वये समिती गठीत करण्यात आली. न्यायालयाच्या ३ सप्टेंबर २०२४ रोजी पारित केलेल्या आदेशामध्ये नमूद केल्याप्रमाणे समितीची कार्यकक्षा निश्चित करण्यात आली.
समितीचा अहवाल सदस्य सचिव तथा शिक्षण संचालक (प्राथमिक) पुणे यांच्या २५ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या पत्रान्वये शासनास सादर करण्यात आला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांवरील होणाऱ्या अत्याचाराची तक्रार पॉस्को ई बॉक्स आणि चिराग या ऍपवर करण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करावी. शाळा परिसरात कंपाउंड वाल, सकाळी दुपारी व शाळा सुटताना विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंद घ्यावी, विद्यार्थी अनुपस्थित असल्यास पालकांना मॅसेज करावा विद्यार्थ्यांचे समुपदेशन करावे आणि कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करणे बंधनकारक आहे. विद्यार्थी ज्या बसेसमधून ये-जा करतात त्या बसचालकाची पडताळणी करणे या शिफारशी समितीने केल्या आहेत.
लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ हा केंद्र शासनाचा कायदा व सदर कायद्याखालील नियमावली केंद्र १४ नोव्हेंबर २०१२ पासून शासनाने लागू केले आहे. लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती समजताच संबंधित शैक्षणिक संस्था व्यवस्थापन, शिक्षक व शाळा यांनी अधिनियमातील तरतुदीनुसार स्थानिक पोलीस स्टेशन अथवा विशेष किशोर पोलीस पथक यांना कळवणे बंधनकारक असणार आहे.




