राजकारण : कार्यकर्ता आणि घराणेशाही


भारत  हा  लोकशाही  प्रधान  देश  आहे.  राजकारणाचा  कार्यकर्ता  आणि  घराणेशाही  यांच्याशी  परस्पर  पूरक संबंध  आपल्या  देशात दिसून येतो.  कारण  राजकारण  हे  कार्यकर्त्याशिवाय  होऊच  शकत  नाही.  राजकारणात कार्यकर्त्यांचा  सर्वात  मोठा  वाटा आहे.  ज्यावेळी  एखाद्या  पक्षाची  स्थापना  होते  त्यावेळी  ती  कार्यकर्त्यांच्या आधारावरच  केली  जाते. जर  पक्षामध्ये  कार्यकर्तेच  नसतील  तर  पक्षाची  स्थापना  कोणत्या  आधारावर करावी,  म्हणून  कार्यकर्त्यांशिवाय  कोणताही  पक्ष  हा  शून्य आहे.  कोणत्याही  पक्षाला  वाढविण्याचे  काम  हा कार्यकर्ता करत असतो. ज्याप्रमाणे एखाद्या कंपनीच्या कामासाठी, तिच्या वाढीसाठी माणसे ठेवली जातात त्याचप्रमाणे  पक्षाच्या  वाढीसाठी  माणसांचे  संघटन  केले  जाते.  कंपनी  आणि  पक्ष  यामध्ये  फरक  एवढाच आहे  कि  कंपनी  कामावर  असलेल्या  व्यक्तींना  कामाच्या  मोबदल्यात  वेतन  देते  आणि  पक्ष  कार्यकर्त्यांना विविध  पदे  देऊन  त्यांचा  सन्मान  करते.  पण  राजकारणात  अशी  फार  कमी  लोकं  आहेत जी यशस्वी  होतात.  राजकारणात  यशस्वी  होण्याचा  सर्वात  मोठा  फंडा  म्हणजे  कपटीपणा,  म्हणजे  सध्याच्या राजकारणात  जे  चालू  आहे.

Advertisement

तसेच  समाज  आणि  राजकारण  यांचा  देखील  परस्पर  पूरक  संबंध  आहे. स्वातंत्र्य  पूर्व  काळापासून  राजकारण  चालू  आहे.  पण  त्यावेळचे  राजकारण  हे  समाजाच्या  हितासाठी  होते, समाजावर  होणारे  अन्याय  अत्याचार  दूर  करण्यासाठी  होते,  पण  आताचे  राजकारण  हे  त्याच्या अगदी विपरीत आहे.   पूर्वीच्या  काळी  घराणेशाहीला  तितकासा  वाव  नव्हता.  कारण  त्यावेळी  आपल्या  देशावर इंग्रजांचे  राज्य  होते  आणि  त्यांच्या  गुलामीतून  मुक्त  होण्यासाठी  राजकारणापेक्षा  समाजकारणाला  जास्त महत्व  देण्यात  आले  होते.  त्यामुळेच  आपण  इंग्रजांच्या  गुलामगिरीतून  मुक्त  झालो.  स्वातंत्र्यानंतरच्या काही  कालावधी  नंतर  राजकारणात  घराणेशाहीला  सुरुवात  झाली  आणि  तिच  परंपरा  अजूनही  सुरु  आहे. राजकारणात  आपल्याच  घराण्याचे  वर्चस्व  राहावे  आणि  कार्यकर्त्यांनी  त्यांच्यासाठी  तसेच  पक्ष  वाढीसाठी झटत  राहावे  (काही अपवाद वगळता)  हीच  भावना  राजकारण्यांच्या  मनात  असते.  जी  लोकं  सतत  त्यांची हाजी  हाजी  करत  असतात  अशाच  लोकांना  ते  पुढे  करतात  आणि  बाकीचे  आहे  तसेच  राहतात.  सामान्य कार्यकर्त्यांचा  पक्षाच्या  वाढीसाठी  फक्त  वापर  करून  घेतला  जातो.  राजकारणातील  सत्य  हे बऱ्याच अशा चित्रपटांमधून  दाखवण्यात  आले   आहे  तरी  पण  लोकं  आमचे  साहेब, आमचे  साहेब  हि  संकल्पना  राबवित असतात.  साहेबांचा  आदेश  म्हणजे  काळ्या  दगडावरची  रेघ  यानुसार  कार्यकर्ते  विचार  बाळगून  आहेत.  अशी बरीचशी  उदाहरणे  आहेत  कि  एक  सामान्य  कार्यकर्ता  हा  पक्षात  आपले  वर्चस्व  राहावे  यासाठी  काहीही करायला  तयार  असतो.

एकाच  घरातील  व्यक्ती  नगरसेवक,  आमदार,  खासदार  आणि  मंत्री  देखील असतात.  तरी पण सत्तेचा  एवढा  हव्यास  कशाला?   प्रत्येकवेळी  जर  एकाच  घरातून  उमेदवार  उभे  राहत  असतील   तर  मग  बाकीच्या  कार्यकर्त्यांना  संधी  कधी  मिळणार,  आजन्म  त्यांनी  फक्त  कार्यक्रमांच्या  सतरंज्याच  उचलत राहावे का ?.  कार्यकर्त्यांना  फक्त  आश्वासने  मिळतात  पुढच्या  टर्म  ला  तुझा  नंबर  लावतो  काळजी  करू  नकोस,  मी  आहे  ना. पक्षात  तुझं  काम  चांगलं  आहे,  सगळी  लोकं  तुझ्या  कामाची  वाहवा  करतात,  असे  दोन  चार  डायलॉग  म्हणाले  कि  कार्यकर्ता  खुश,  पुढच्या  वेळी  आपल्या  नावाचा  विचार  करतो  म्हणून साहेब  म्हणाले  या  आशेवर  लागतो  बिचारा  परत  जोमाने  कामाला. (कटू आहे पण सत्य आहे).

राजकारणात  घराणेशाही  ही  चालूच  राहणार  यात  काही  शंका  नाही.  सध्याचे  राजकारण  हे  अगदी  खालच्या  थराला  गेले  आहे  असे  म्हटले  तरी  ती  अतिशयोक्ती  होणार  नाही.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!