सुनील तटकरे भाजपमध्ये जाणार
लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला जाहीर होणार आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे दोन्ही गट सतत एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करताना दिसत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही गटातील नेत्यांमध्ये सातत्याने या ना त्या कारणावरुन राजकीय वाद पाहायला मिळतात. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एक मोठा दावा केला आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर शरद पवार यांच्या पक्षातील काही नेते काँग्रेसमधील जातील असे तटकरे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे युवकचे नेते मेहबुब शेख यांनी भूमिका मांडली आहे.
येत्या ४ जूनच्या लोकसभा निकालानंतर अजित पवार गटाचे बरेच आमदार बाहेर पडणार आहेत. कारण ४ जूननंतर अजितदादा गटाची नौका बुडणार आहे. त्या बुडणाऱ्या नौकेत आता कोणीही बसणार नाही, म्हणून स्वतः सुनील तटकरे हे देखील भारतीय जनता पार्टीच्या नावेत बसण्याची तयारी करत आहेत असे मेहबुब शेख यांनी म्हटलं आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटातील मोठा गट काँगेसमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे. तटकरेंच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच मेहबूब शेख म्हणाले की, अजित पवार गटाच्या नेत्यांना भारतीय जनता पार्टीत जाण्याशिवाय काहीच पर्याय नाही. कारण त्यांना माहित आहे की, आता आपल्याला शरद पवार साहेबांकडे कधीही एंट्री मिळणार नाही.
जे लोक शरद पवार साहेबांवर, सिल्व्हर ओकवर प्रेम करत आहेत तेवढीच लोक आता आमच्या पक्षात शिल्लक राहिली आहेत. जे जाणारे होते ते आता निघून गेले आहेत. त्यामुळे आता कोणी ही जाणार नाही. तसेच आपल्या पक्षाला वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड आणि स्टेटमेंट हे अजित पवार गटाचे नेते मंडळी करत असल्याचे मेहबुब शेख यांनी म्हटलं आहे.





