भुजबळांच्या “त्या” वक्तव्यावर निलेश राणेंचे प्रत्युत्तर
यंदाची लोकसभा निवडणूक ही महायुतीने मिळून लढवली आहे. त्यातच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी कालच एका ठिकाणी बोलताना भाजपवर निशाणा साधला होता.
राष्ट्रवादीला ८०-९० जागा देण्याचा भाजपचा शब्द आहे. लोकसभेसारखी विधानसभेला खटपट होता कामा नये, आपला हक्काचा वाटा आपल्याला मिळाला पाहिजे, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. इतकंच नाही तर त्यांनी भाजपच्या ४०० पार नाऱ्याबाबतही भाष्य केलं.
भुजबळ यांच्या या विधानावर भाजप नेते निलेश राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. निलेश राणे यांनी ट्वीट करत भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. एकाच आघाडी मध्ये राहून या दोन नेत्यामध्ये सध्या जुंपल्याचं दिसून येतंय.
श्री छगन भुजबळांना आवरलं पाहिजे,मी भारतीय जनता पक्षाचा एक लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही नेहमी भुजबळांचं का ऐकून घ्यावं? मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असताना सुद्धा आम्ही त्यांची बाजू घेतली नाही, भुजबळ सतत बीजेपीला डिवचत असतात, त्यांची ही भूमिका योग्य नाही, असं निलेश राणे म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले की, “आम्हाला असंच पाहिजे आम्हाला तसंच पाहिजे, ही भाषा एका नेत्याला शोभत नाही. आम्ही तुमच्या वयाचा आदर करतो पण उठसूट कोण युती बिघडवायची भाषा बोलत असेल तर सहन होत नाही आणि होणारही नाही. कारण, भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष असून सुद्धा या पक्षाने नेहमी सकारात्मक भूमिका ठेवली आहे.”, असं ट्वीट निलेश राणे यांनी केलंय.
देशात दलित समाजाच्या मनात भाजपाने ४०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या तर देशाचं संविधान बदललं जाणार, ही गोष्ट प्रचंड बिंबवली गेली. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक मुलाखती आणि प्रचारसभांमधून याचे उत्तर द्यावे लागले. एनडीए ४०० पार गेल्यामुळे आपल्या देशाचं संविधान बदललं जाणार नाही, ही गोष्ट लोकांना पटवून देताना आमच्या नाकीनऊ आले”, असं छगन भुजबळ म्हणाले होते. यालाच निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.





