देशात ३०० च्या वर जागा जिंकू – नाना पटोले
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यासाठी १ जून रोजी मतदान होणार असून ४ जून रोजी देशात कुणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे. त्या पूर्वी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मोठा दावा केला आहे. आम्ही यंदा महाराष्ट्रात ४० च्या पुढे तर देशात ३०० च्या वर जागा जिंकू, असा विश्वास पटोलेंनी व्यक्त केला आहे.
राहुल गांधी यांच्या यात्रेत लोकांनी भरघोस प्रतिसाद दिलाय. इंडिया आघाडीला पूर्ण देशात समर्थन मिळाले आहे. त्यामुळे आज मतदानाच्या शेवटच्या टप्प्यानंतर टीव्ही चॅनेल्सवर प्रसारित होणाऱ्या एक्झिट पोलमध्ये देखील त्याचा परिणाम दिसून येईल, असं नाना पटोलेंनी सांगितलं आहे.
गेल्या दहा वर्षांमध्ये जर आपण बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल जनतेच्या मनात खूप रोष आहे, असं म्हणत नाना पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
देशाचे प्रधानमंत्री सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत खोटं बोलतात. दहा वर्षांमध्ये देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत. देशाचं संविधान सुरक्षित नाही. स्वातंत्र्यानंतरचा दुसरा महायुद्ध लोकशाहीच्या माध्यमातून सुरू आहे. आता ही निवडणूक खरी जनतेनेच हातात घेतलेली आहे, असं नाना पटोले म्हणाले. यावेळी बोलताना नाना पटोलेंनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडत चालला असून त्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार आहेत, त्यांनी राजीनामा द्यावा, असं पटोलेंनी म्हटलंय.
उद्धव ठाकरे हे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. त्यावरून होत असलेल्या टीकेवर नाना पटोले यांनी उत्तर देत सरकारवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे म्हणजे सरकार नाही. हे काम आता सरकारचे आहे. त्यामुळे त्यांनी कुठे राहावे, हा त्यांचा प्रश्न आहे, असंही पटोले म्हणाले.





