आमदार रवी राणांच्या वक्तव्याने खळबळ
अमरावतीचे आमदार रवी राणा यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यावर १५ दिवसात उद्धव ठाकरे हे सरकारमध्ये दिसतील, असं रवी राणांनी म्हटलं आहे.
येणारा काळ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असणार आहे. देशाचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गरजेचे आहेत. हे उद्धव ठाकरे यांना माहिती आहे, असं रवी राणा म्हणाले.
नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी जी खिडकी उघडून ठेवली आहे. त्या खिडकीतून निकालाच्या वीस दिवसानंतर उद्धव ठाकरे हे मोदी यांच्या सोबत महायुतीत जातील, असा दावाही रवी राणा यांनी केला आहे.
दोन लाखांपेक्षा जास्त मतांनी नवनीत राणा या निवडून येतील असा विश्वास व्यक्त करत अहकांरी नेत्याच्या अहंकाराचा चुराडा जनता करणार आहे. जनता त्यांना धडा शिकवणार आहे. अहंकारी नेत्याचा अहंकार दाबण्याचं काम जनतेने केले आहे असेही रवी राणा म्हणाले.
१ जून रोजी सातव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लागलीच एक्झिट पोल जाहीर झाले. आता ४ जूनच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागलं आहे.
सर्वांनीच भाजपच्या बाजूने एकमत दिले आहे. पण काही राज्यांत भाजपच्या विजयाला काँग्रेस सुरुंग लावण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.





