मनोज जरांगे पाटलांचा एल्गार
लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे आणि याच दिवशी जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले आहे.
इतकंच नाही तर, विधानसभा निवडणुका होण्यापूर्वीच त्यांनी एक मोठी घोषणा देखील केली आहे. मराठा समाजाच्या सरसकट कुणबीत समावेशासाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा मोठी भूमिका घेतली आहे.
यावेळी त्यांनी अनेकांना इशारा देखील दिला आहे. जरांगे पाटील यांनी यावर्षाच्या सुरुवातीला आणि मागच्या वर्षी केलेल्या आंदोलनामुळे राज्यकर्त्यांना हादरवून सोडलं होतं. आता त्यांनी पुन्हा एकदा सरसकट कुणबी प्रमाणपत्रासाठी उपोषण करणार असल्याचे म्हणाले आहेत.
२०१३ साली कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका फसवणुकीचा गुन्ह्यामध्ये त्यांना वॉरंट बजावण्यात आलं होतं, त्यासाठी जरांगे पाटील आज पुण्यातील कोर्टात हजर झाले होते. पुण्यातील शिवाजीनगर येथील न्यायालयाकडून त्यांच्याविरोधातील वॉरंट रद्द करण्यात आले. यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधत मोठी घोषणा केली.
“सगे सोयरे अंमलबजावणी आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही तर, विधानसभेच्या रिंगणात २८८ उमेदवार उभे करणार.”, अशी घोषणाच मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
४ जून रोजी लोकसभेचा निकाल लागणार आहे. याच दिवशी जरांगे पाटील यांनी उपोषणाचा इशारा दिलाय. यामुळे राजकारण चांगलंच तापण्याची शक्यता आहे. यावेळी जरांगे पाटील यांनी नाव न घेता राजकीय नेत्यांवर देखील मोठं भाष्य केलं.





