केजरीवालांची दिल्लीकरांना भावनिक साद
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल २ जून ला पुन्हा तुरुंगात जाणार आहेत. दिल्ली सरकारच्या कथित मद्य घोटाळ्याच्या प्रकरणात ते आरोपी असून निवडणूक प्रचारासाठी त्यांना अंतरिम जमीन देण्यात आला होता. न्यायालयाने त्यांना दिलेली मुदत आता संपत आहे.
त्यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी ते अत्यंत भावुक झाल्याचं दिसून आलं. त्यांनी दिल्लीतील जनतेला भावनिक आवाहन केलं आहे. निवडणूक प्रचारासाठी अंतरिम जामीन दिल्याबद्दल केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले.
“न्यायालयानं दिलेली मुदत आता संपत आहे. मी पुन्हा तिहार तुरुंगात जात आहे. देशाला तानाशाहीपासून वाचवण्यासाठी तुरुंगात जात आहे याचा मला अभिमान आहे. देश वाचवण्यासाठी मला जीव द्यावा लागला तरी कुणी वाईट वाटून घेऊ नका. माझ्या आई-वडिलांची काळजी घ्या.”, असं भावनिक आवाहन यावेळी केजरीवाल यांनी केलं आहे.
माझी तुम्हाला एकाच विनंती आहे कि, मी तुरुंगात गेल्यानंतर माझ्या आई-वडिलांची काळजी घ्या. तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा, जेणेकरून ते निरोगी राहतील. माझी पत्नी सुनीता खूप खंबीर आहे आणि ती प्रत्येक अडचणीत माझ्या सोबत असते, असं केजरीवाल म्हणाले. यावेळी त्यांनी प्रकृती ठीक नसल्याचं देखील सांगितलं.
“तुरुंगात असताना त्यांनी अनेक दिवस माझं इन्सुलिनचं इंजेक्शन बंद केलं. माझ्या रक्तातील साखर वाढली. तुरुंगात 50 दिवस होतो. या काळात माझं वजनही कमी झालंय. बाहेर आल्यानंतरही ते वाढलं नाही. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कदाचित हे एखाद्या मोठ्या आजाराचं लक्षण असावं. यावेळी तुरुंगात माझा आणखी छळ केला जाण्याची शक्यता आहे.”, असा आरोप देखील यावेळी अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
यावेळी केजरीवाल यांनी दिल्लीकरांना मोठं आश्वासन देखील दिलं. “मी जेलमध्ये असो किंवा बाहेर, दिल्लीची कुठलीही कामं थांबणार नाहीत. मोफत वीज, मोहल्ला क्लिनिक, हॉस्पिटल, मोफत औषधं सगळं काही सुरू राहील.”, असं केजरीवाल म्हणाले आहेत.





