शिंदे गटात गेलेल्या वायकरांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर विरूद्ध शिंदे गटाचे रवींद्र वायकर हे आमनेसामने लढणार आहेत. अमोल किर्तीकर आणि रवींद्र वायकर हे गेली अनेक वर्षांपासून एकाच पक्षात काम करत होते. मात्र रवींद्र वायकर यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर प्रचंड तणाव निर्माण केला गेला असल्याचा दावा आता स्वत: वायकरांनी माध्यमांसोबत मुलाखतीत बोलताना व्यक्त केला आहे. याबाबत नुकताच रवींद्र वायकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
त्यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. शिंदे गटातून मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळाली आहे. मात्र यामागे मला आणि माझ्या पत्नीला गोवण्यात आलं आहे. पक्षात जाणे किंवा गजाआड जाणे असे दोनच पर्याय माझ्यासमोर होते. जड अंतकरणाने मी पक्ष बदलला. नियतीने माझ्यावर जी वेळ आणली होती ती इतर कोणावरही येऊ नये, असं रवींद्र वायकरांनी सांगितलं.
अगदी अलिकडेच त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. उशीरा का होईना पण त्यांना मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी मिळाली. अशात त्यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
माझ्या हातातील शिवबंधन हे बाळासाहेब असल्यापासून आहे. धनुष्यबाण देखील माझ्या खांद्यावर होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत ५० वर्षे राहिल्यानंतर मला उद्धवजींची साथ सोडावी लागली. कुटुंबाला आपण पारखे होतो, तशीच माझी भावना होती. मात्र नियतीने माझ्यासमोर मोठा पेच निर्माण करून ठेवला होता. तसेच माझ्यासमोर दुसरा कोणता पर्याय देखील नसल्याचं रवींद्र वायकर म्हणाले.




