समता नगर स्वामी समर्थ मंदिर वाद: Adv. दीपक जगदेव
मुंबई : निर्भीड समाचार वृत्तसेवा
समता नगर पोलीस ठाण्याच्या परिसरातील स्वामी समर्थ मंदिर, धार्मिक कार्यक्रम, गर्दी, अतिक्रमण आणि आर्थिक व्यवहारांबाबत दीपक जगदेव यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. संबंधित आरोपांची अधिकृत चौकशी होऊन वस्तुस्थिती समोर येणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
त्यांनी उपस्थित केलेले प्रमुख सवाल असे—
* पोलीस ठाण्याच्या परिसरातील स्वामी समर्थ मंदिरासाठी परवानगी घेण्यात आली आहे का?
* पोलीस ठाणे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी आहे की नागरिकांच्या तक्रारी आणि कायदा-सुव्यवस्थेसाठी?
* दर गुरुवारी तसेच गुरु पौर्णिमेला मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होत असल्यास वाहतूक आणि नागरिकांच्या गैरसोयीची जबाबदारी कोणाची?
* पोलीस ठाण्याबाहेर फुलहारांचे स्टॉल लावले जात असल्यास त्यांना कोणाची परवानगी आहे?
* धार्मिक कार्यक्रमांसाठी सामान्य नागरिकांना BMC, पोलीस व इतर विभागांच्या परवानग्या घ्याव्या लागतात, तर पोलीस ठाण्याच्या परिसरात कायमस्वरूपी मंदिर उभारण्यासाठी कोणत्या परवानग्या घेण्यात आल्या?
* शासकीय जागेवरील बांधकामासंदर्भात BMC आणि संबंधित प्रशासनाने काय कारवाई केली?
* पोलीस ठाणे ही सरकारी मालमत्ता असताना ते कोणत्याही व्यक्तीच्या किंवा धार्मिक संस्थेच्या मालकीचे असल्याप्रमाणे वापरले जाऊ शकते का?
* मंदिरामुळे तक्रारदार, महिला तसेच इतर धर्मीय नागरिकांना पोलीस ठाण्यात येण्यास मानसिक किंवा प्रत्यक्ष अडचण निर्माण होत नाही का?
* धार्मिक कार्यक्रमांदरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची?
* मंदिरासाठी 2023 पासून जमा झालेल्या देणग्या किंवा खर्चाचा हिशोब कोणाकडे आहे? त्याचे लेखापरीक्षण झाले आहे का?
* मंदिर उभारण्यासाठी वापरण्यात आलेल्या निधीचा स्रोत काय आहे?
* परिसरातील मोठे झाड तोडून मंदिर बांधण्यात आले असल्यास वृक्षतोडीसाठी कायदेशीर परवानगी घेण्यात आली होती का?
* पोलीस ठाण्यात धार्मिक बांधकाम करण्यास शासनाची किंवा सक्षम प्राधिकरणाची परवानगी आहे का?
* पोलीस ठाण्यात धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्याऐवजी पोलीस आणि नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह व अन्य प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देणे अधिक आवश्यक नाही का?
* जर एखाद्या धर्माचे धार्मिक बांधकाम पोलीस ठाण्याच्या परिसरात मान्य असेल, तर इतर धर्म किंवा महापुरुषांच्या स्मारकाबाबत समान निकष लागू होतील का?
* पोलीस कर्मचारी धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनात किंवा व्यवस्थापनात सहभागी होत असल्यास त्यांच्या शासकीय कर्तव्यावर त्याचा परिणाम होत नाही का?
* मंदिराच्या नावाखाली कोणताही आर्थिक गैरव्यवहार झाला आहे का, याची स्वतंत्र चौकशी झाली आहे का?
* मंदिर परिसरातील गर्दी, पार्किंग आणि अतिक्रमणामुळे पोलीस अधिकारी, कर्मचारी, तक्रारदार आणि नागरिकांना अडथळा निर्माण होत नाही का?
* “तक्रारदारांनी आता न्यायासाठी मंदिरात जायचे की पोलीस ठाण्यात?” असा सवालही जगदेव यांनी उपस्थित केला आहे.
दीपक जगदेव यांनी पुढे असा आरोपही केला आहे की, मंदिराच्या व्यवस्थापनाशी संबंधित व्यक्ती आणि काही पोलिसांमधील संबंध, आर्थिक व्यवहार तसेच चोरीच्या कथित घटनांची स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक आहे.





