घटनास्थळी दहा मिनिटांत न पोहोचल्याने पोलिसांना ‘कारणे’ दाखवा नोटीस..!!
मुंबई : पोलिसांना नियंत्रण कक्षाकडून एखादी घटनेची माहिती मिळताच दहा मिनिटांत घटना स्थळी पोहोचणे अपेक्षित आहे. मात्र वाहतूक कोंडी, व्हीआयपी बंदोबस्त, तसेच पोलीस ठाण्यातील इतर कामांमुळे पोलिसांना वेळेचे गणित जुळवणे म्हणजे जणू तारेवरची कसरतच. मात्र विविध कारणांचे अडथळे दूर करण्याऐवजी अधिकारी पोलिसांना विलंब झाल्याबद्दल “कारणे” दाखवा नोटीस बजावत असल्यामुळे मुंबई पोलिस दलामध्ये नाराजीचा सूर आहे.
मुंबई पोलिस दलातील १३ विभागातील उपायुक्तांकडून सध्या दररोज पोलिस ठाण्यांचा आढावा घेतला जात आहे. यामध्ये घटनास्थळी १० मिनिटांपेक्षा अधिक वेळ घेतलेल्या पोलिस पथकाला कारणे दाखवा नोटीस बजावली जात आहे. या नोटिसीद्वारे कारवाईचा ईशारा आणि दंड ठोठावण्यात येत आहे.
दुतर्फा असलेली वाहनांची पार्किंग, वाहनांची संख्या वाढल्याने वाहतुकीची होणारी कोंडी, एकाच वेळी देण्यात येणारी अनेक कामे अशी विविध कारणे सांगून देखील किंवा वरिष्ठांना माहित असून देखील कारवाई करण्यात येत असल्यामुळे पोलीस दलामध्ये नाराजीचा सूर आहे. पश्चिमेकडील पोलिस ठाण्याला जर पूर्वे कडील कॉल मिळाला तर दहा मिनिटांत पोहोचणे कसे शक्य आहे, असा प्रश्न पोलिस पथकाकडून केला जात आहे.
यासाठी काही उपाययोजना करण्याची गरज आहे, असे काहींचे म्हणणे आहे.
१) घटनास्थळी पोहोचणाऱ्या पथकाला अन्य कोणतेही काम देऊ नये.
२) पोलिसांना GPS प्रणालीची माहिती देण्यात यावी.
३) बीट चौकी आणि हद्दीनुसार कॉल देण्यात यावे.
४) वाहतूक कोंडीतुन मार्ग काढण्यासाठी वाहतूक पोलिसांची मदत घेण्यात यावी.
५) बीट चौकी आणि कॉल साठी स्वतंत्र वाहने असावीत.





