वनविभागाच्या दस्तऐवज प्रक्रियेत सुसूत्रता आणा; दिंडोशी मनसे विभाग अध्यक्ष ॲड. भास्कर परब यांची अधिकाऱ्यांशी महत्त्वाची चर्चा..!!
प्रतिनिधि, मुंबई : मालाड येथील कुरार गाव, आप्पापाडा परिसरातील वनविभागाच्या जमिनीवर राहणाऱ्या झोपडीधारकांसाठी सुरू असलेल्या दस्तऐवज पडताळणी प्रक्रियेत वनविभागाकडून स्थानिकांना नाहक त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, स्थानिक लोकप्रतिनिधींनी वनविभाग चौकीत धाव घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि ही प्रक्रिया सुलभ व पारदर्शक करण्याची आग्रही मागणी केली.

वनविभागाच्या जमिनीवर वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना त्यांच्या झोपड्यांच्या पात्रतेसाठी वनविभागाकडे आवश्यक कागदपत्रे जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, ही कागदपत्रे जमा करताना तांत्रिक अडचणी निर्माण करणे, स्पष्ट माहिती न देणे आणि नागरिकांना वारंवार चकरा मारायला लावणे, अशा प्रकारांमुळे रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता.

नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत ॲड. भास्कर परब यांनी वनविभागाच्या चौकीला भेट देऊन तेथील अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. “नागरिकांकडे असलेले वैध दस्तऐवज स्वीकारताना त्यांना विनाकारण त्रास देऊ नका. नियमावलीबाबत स्थानिकांना स्पष्ट आणि योग्य माहिती द्या, जेणेकरून त्यांची दिशाभूल होणार नाही,” अशा स्पष्ट सूचना यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
दस्तऐवज स्वीकृतीची ही प्रक्रिया केवळ कागदोपत्री न राहता ती सामान्य जनतेसाठी सुलभ आणि पारदर्शक असावी, अशी ठाम मागणी यावेळी ॲड. भास्कर परब यांच्याकडून करण्यात आली. प्रशासनाने याकडे केवळ एक तांत्रिक प्रक्रिया म्हणून न पाहता, वर्षानुवर्षे तिथे राहणाऱ्या गरिबांना न्याय देण्याच्या उद्देशाने सकारात्मक भूमिका घ्यावी, असेही यावेळी ॲड. भास्कर परब म्हणाले. या भेटीनंतर आता वनविभाग आपली कार्यपद्धती सुधारून स्थानिकांना दिलासा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





