जंतर-मंतरवर थरार! अभिजीत दिपके यांचे आमरण उपोषण!
मुंबई : निर्भीड समाचार वृत्तसेवा
नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनाला आज अत्यंत नाट्यमय आणि आक्रमक वळण मिळाले आहे. नीट (NEET UG 2026) पेपर लीक घोटाळ्याच्या चौकशीसाठी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या २१ दिवसांपासून उपोषणाला बसलेले प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलनस्थळावरून हटवले आहे. वांगचुक यांची प्रकृती खालावल्याचे कारण देत त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या कारवाईनंतर संतप्त झालेले ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केंद्र सरकारला तगडे आव्हान देत स्वतः आमरण उपोषणाची घोषणा केली असून ते जंतर-मंतरवर अन्नत्यागावर बसले आहेत.
मध्यरात्री पोलिसांचा गराडा आणि बळाचा वापर: प्राप्त माहितीनुसार, शनिवार सकाळी ७ च्या सुमारास दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी जंतर-मंतरवरील आंदोलन छताला वेढा घातला. २० जुलै रोजी आयोजित ‘संसद मार्च’ रोखण्यासाठी आणि आंदोलन चिरडण्यासाठी केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. पोलिसांच्या एका मोठ्या पथकाने स्टेजवर जाऊन सोनम वांगचुक यांना पांढऱ्या चादरीच्या आडून घसघशीत ओढत आणि फरफटत रुग्णवाहिकेत टाकले. यावेळी तिथे उपस्थित तरुण आणि सुरक्षा रक्षकांमध्ये मोठी झटापट झाली.
“पोलिसांची ही कारवाई हुकूमशाही आणि चोरांसारखी होती. त्यांनी सोनम सरांना शिवीगाळ केली आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्यांना ताब्यात घेतले,” असा गंभीर आरोप अभिजीत दिपके यांनी केला आहे. या झटापटीत दिपके यांच्यासह इतर काही कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी मारहाण करत ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.
“आता थेट पंतप्रधान मोदींचा राजीनामा मागणार!” – अभिजीत दिपके आक्रमक: सोनम वांगचुक यांना रुग्णवाहिकेतून घेऊन गेल्यानंतर अभिजीत दिपके यांनी जंतर-मंतरवरूनच केंद्र सरकारविरोधात एल्गार पुकारला. “जर सरकारला वाटत असेल की सोनम सरांना इथून हटवून हे आंदोलन संपवता येईल, तर तो त्यांचा भ्रम आहे. आमची लढाई देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आहे. आतापर्यंत आम्ही केवळ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होतो, पण आजच्या या नीच कृत्यानंतर आम्ही थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत,” असे दिपके यांनी जाहीर केले.
दिपके यांनी आजपासून आपले ‘अनिश्चित कालीन आमरण उपोषण’ सुरू केले असून, २० जुलै रोजी ठरलेला ‘चलो संसद’ मार्च कोणत्याही परिस्थितीत होणारच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
वांगचुक यांचे वजन ९.५ किलोने घटले: नीट परीक्षेतील गैरव्यवहाराच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टीने (CJP) २० जूनपासून आंदोलन सुरू केले होते. त्याला पाठिंबा देण्यासाठी २८ जूनपासून सोनम वांगचुक जंतर-मंतरवर उपोषणाला बसले होते. सलग २१ दिवस केवळ पाण्याच्या आधारावर राहिलेल्या वांगचुक यांचे वजन तब्बल ९.५ किलोने घटले होते. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी या कारवाईचा बनाव रचल्याचे बोलले जात आहे. वांगचुक यांच्यासोबत ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (AISA) काही विद्यार्थिनीही उपोषणाला बसल्या असून त्यांची प्रकृतीही चिंताजनक आहे.
काय आहे ‘कॉकरोच जनता पार्टी’ आंदोलन: काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान बेरोजगार तरुणांची तुलना एका संदर्भात ‘कॉकरोच’ (झुरळ) सोबत झाल्याचा आरोप करत देशातील तरुणांनी उपरोधिकपणे ‘कॉकरोच जनता पार्टी’ची स्थापना केली होती. या आंदोलनाला देशातील लाखो विद्यार्थ्यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी, महाविकास आघाडीच्या नेत्या सुषमा अंधारे, सुप्रिया सुळे आणि अरविंद केजरीवाल यांनी पाठिंबा दिला आहे.
अभिजीत दिपके यांच्या या आमरण उपोषणाच्या पवित्र्यामुळे आणि २० जुलैच्या संसद मार्चच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील राजकीय वातावरण प्रचंड तापले असून केंद्र सरकार बॅकफूटवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





