‘सकाळ’ मुंबई आवृत्तीचा ५५ वा वर्धापन दिन सोहळा संपन्न; महापौर रितुताई तावडे यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती..!!
मुंबई : निर्भीड समाचार News Desk
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेमध्ये ‘सकाळ’ मीडिया ग्रुपने नेहमीच उच्च मूल्यांची परंपरा जपली आहे. समाजजीवनातील घडामोडींना दिशा देणारे, जनमत घडवणारे आणि सकारात्मक बदलांना चालना देणारे प्रभावी माध्यम म्हणून ‘सकाळ’ने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आज ५ मार्च २०२६ रोजी ‘सकाळ’ मुंबई आवृत्तीच्या ५५ व्या यशस्वी वर्षाच्या निमित्ताने आयोजित ‘सकाळ सन्मान सोहळा’ पुरस्कार वितरण समारंभ मुंबईत मोठ्या उत्साहात पार पडला.
या दिमाखदार सोहळ्याला मुंबईच्या प्रथम नागरिक आणि महापौर रितुताई तावडे यांनी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थिती लावली होती. यावेळी बोलताना महापौर म्हणाल्या की, “सकाळ मीडिया ग्रुप हे केवळ एक वृत्तपत्र नसून मुंबईतील सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे एक प्रभावी माध्यम आहे. गेली ५५ वर्षे मुंबईतील वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत त्यांनी पत्रकारितेतील निस्पृहता आणि समाजहिताची परंपरा कायम ठेवली आहे. या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान होताना पाहणे, ही मुंबईची महापौर म्हणून माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”
या गौरव सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. यामध्ये केंद्रीय मंत्री मा. श्री. रामदास आठवले, महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा. श्री. दादा भुसे, तसेच कॅबिनेट मंत्री व मुंबई उपनगराचे पालकमंत्री मा. श्री. आशिष शेलार यांचा समावेश होता. या सर्व मान्यवरांच्या हस्ते उद्योग-व्यवसाय, शिक्षण, कला, संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना ‘सकाळ सन्मान’ देऊन गौरविण्यात आले.
पत्रकारिता हा लोकशाहीचा सर्वात मजबूत आधार आहे. समाजहिताच्या प्रश्नांना वाचा फोडत, सकारात्मक उपक्रमांना बळ देत आणि जनतेचा आवाज शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवत ‘सकाळ’ने आपला ५५ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे. महापौर रितुताई तावडे यांनी यावेळी ‘सकाळ’ परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवर, ज्येष्ठ पत्रकार आणि ‘सकाळ’ समूहाचे पदाधिकारी उपस्थित होते. ५५ वर्षांच्या या यशस्वी प्रवासाबद्दल मुंबईतील वाचकांनी आणि विविध स्तरातील नागरिकांनीही ‘सकाळ’वर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.





