संगमनेरात ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे वाचन; जयश्री थोरात कडाडल्या!
मुंबई/संगमनेर: निर्भीड समाचार वृत्तसेवा
छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास आणि त्यांचा समतेचा विचार घराघरात पोहोचवण्यासाठी संगमनेरमध्ये एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या आणि युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून संगमनेरमधील नेहरू गार्डन येथे कॉ. गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या जगप्रसिद्ध पुस्तकाचे हजारो नागरिकांनी सामूहिक वाचन केले. यावेळी जयश्री थोरात यांनी महायुतीचे नेते आणि बागेश्वर बाबा (धीरेंद्र शास्त्री) यांच्यावर जळजळीत टीका केली.
नेमकी घटना काय?
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाबाबत आणि त्याच्या प्रकाशकाबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. या विधानाचा निषेध म्हणून आणि शिवरायांचा खरा इतिहास लोकांसमोर मांडण्यासाठी संगमनेरमधील सर्व पुरोगामी संघटना आणि नागरिकांनी एकत्र येत हे सामूहिक वाचन आयोजित केले. कार्यक्रमाची सुरुवात ‘रघुपती राघव राजाराम’ या भजनाने आणि शिवगर्जनेने झाली.
बाळासाहेबांची लेक कडाडली
यावेळी बोलताना जयश्री थोरात यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी थेट महायुतीच्या नेत्यांना धारेवर धरले. त्या म्हणाल्या:
दोटप्पीपणा चालणार नाही: “एकीकडे शिवरायांचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे त्यांच्याबद्दल चुकीची विधाने करणाऱ्यांना अभय द्यायचे, हा महायुतीचा दुटप्पीपणा आता चालणार नाही”.
बागेश्वर बाबांवर टीका: धीरेंद्र शास्त्री यांनी शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केले तेव्हा महायुतीचे मोठे नेते व्यासपीठावर उपस्थित होते, तरीही कोणीही त्यांना रोखले नाही, हे दुर्दैवी आहे.
इतिहास वाचवण्यासाठी लढा: शिवरायांचा चुकीचा इतिहास पसरवणाऱ्यांना रोखण्यासाठीच आम्ही हे सामूहिक वाचन करत आहोत. छत्रपती शिवराय हे १८ पगड जातीच्या रयतेचे राजे होते.
संजय गायकवाड आणि बागेश्वर बाबांचा निषेध
या कार्यक्रमादरम्यान केवळ पुस्तक वाचनच झाले नाही, तर संतप्त शिवप्रेमींनी आमदार संजय गायकवाड आणि धीरेंद्र शास्त्री यांच्या फोटोंना जोडे मारो आंदोलन करून त्यांचा तीव्र निषेध नोंदवला. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे आणि अनेक पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजकीय वर्चस्व आणि वैचारिक लढा
जयश्री थोरात यांनी या आंदोलनाद्वारे केवळ वैचारिक लढाच पुकारला नाही, तर संगमनेरमध्ये आपली राजकीय पकड अधिक घट्ट असल्याचेही दाखवून दिले आहे. महायुतीच्या नेत्यांनी वारंवार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांची पाठराखण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे, ज्यामुळे आगामी काळात राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.





