अजित पवारांचा गौप्यस्फोट
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्यात सतत शाब्दिक वार सुरू असतात. अजित पवारांनी पुन्हा एकदा मोठा गौप्यस्फोट करत शरद पवारांवर गंभीर आरोप केला आहे. त्यांनी २००४ सालच्या मुख्यमंत्री पदाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
२००४ सालच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला बहुमत मिळालं होतं. यात राष्ट्रवादी काँग्रेसला ७१ तर काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या होत्या. तेव्हा राष्ट्रवादीच्या जास्त जागा असूनही मुख्यमंत्री पद हे कॉँग्रेसला मिळालं होतं.
याबाबत अजित पवारांनी अलीकडेच नाराजी व्यक्त केली होती. त्यावर शरद पवार यांनी म्हटलं होतं की, २००४ च्या निवडणुकीनंतर आमच्या पक्षाने मुख्यमंत्रीपद घेतलं असतं आणि छगन भुजबळ किंवा इतर कुठल्या नेत्याला आम्ही मुख्यमंत्री बनवलं असतं तर पक्ष फुटला असता. शरद पवारांच्या या वक्तव्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलीये.
२००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री झाला असता तर आमचा पक्ष फुटला असता हे शरद पवारांचं वक्तव्य धादांत खोटं असून शरद पवारांबरोबरच्या त्यावेळच्या चर्चेत मी देखील होतो. आमच्याबरोबर छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे अशी सगळी वरिष्ठ मंडळी होती.”, असं अजित पवार म्हणाले.
तसंच पुढे ते म्हणाले की, “तेव्हा आम्हाला वाटलं की, मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच असायला हवं. तेव्हा मी मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक नव्हतो. मला वाटत होतं की छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री पद मिळावं. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यावर खऱ्या अर्थाने कोणी जर आमचा पक्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम केलं असेल तर ते काम छगन भुजबळांनी केलं आहे. “, असंही अजित पवार म्हणाले.
पुढे अजित पवारांनी अजून एक खुलासा केला. २००४ मध्ये राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर तिथून पुढे जितकी वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता राहिली, तितकी वर्षे राज्यात आमचाच मुख्यमंत्री राहिला असता. आमच्यापैकी कोणताही नेता मुख्यमंत्रीपदावर बसला असता, कदाचित छगन भुजबळ मुख्यमंत्री झाले असते. त्यानंतर आर. आर. पाटील आणि इतर नेतेही मुख्यमंत्री होऊ शकले असते.”, असा दावाच यावेळी अजित पवार यांनी केला.





