“माता रमाई आंबेडकर चौक” क्रांती नगर येथे शॉर्ट्सर्किटमुळे लागली आग, तरुणांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली…!!
मुंबई : काल संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास माता रमाई आंबेडकर चौक, क्रांती नगर, कांदिवली (पूर्व), मुंबई या ठिकाणी विजेच्या खांबाला आग लागली. तिथे उभे असलेल्या तरुणांनी आग आटोक्यात आणली अन्यथा मोठी दुर्घटना झाली असती. पण समजा हेच शॉर्टसर्किट जर रात्री १२ नंतर किंवा पहाटे झाली असती तर नेमकं चित्र काय झालं असतं हे सांगण्याची गरज नाही, कारण या आधी आपण बाजूलाच असणाऱ्या दामूनगर आणि आप्पापाडा येथे लागलेली आग, तेथे झालेले नुकसान लोकांनी डोळ्यांनी पाहिलं आहे.
आग लागण्याचे कारण काय तर मीटर बॉक्समधून वीज चोरून झोपडपट्टीत अनधिकृतरित्या वीज पुरवणे असे ज्यांचे धंदे आहेत त्यांच्यामुळे पावर लोड जास्त होऊन शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागली हे मुख्य कारण या मागे आहे असं सहज कळतं.
पण ही वेळ का आली की लोकांना मुंबई सारख्या शहरातसुद्धा आजघडीला वीज चोरून वापरावी लागते.
कारण या वस्तीत राहणाऱ्या नागरिकांना स्वतःचे वीज मीटर नाही कारण त्यांना स्वतःचे हक्काचे घर नाही. म्हणून मग जो कोणी वीज चोरून देतो तो प्रत्येक पॉईंटच्या हिशोबाने भाडे आकारतो आणि तेथे राहणारे नागरिक ते देवू शकतात. पण ज्यांनी झोपडपट्टीत सुद्धा भाड्याने मीटर बसवलं असेल त्याचं भाडं बघता सामान्य मजुरांना ती मिटरची वीज परवडत नाही कारण त्याचं भाड हे जवळपास २००० ते ३००० रुपये महिना येत असतं. म्हणून स्थानिक आमदार, खासदार यांनी याकडे लक्ष देऊन लोकांच्या प्रश्नांची सुटका करावी.
कारण अनेकजण बोलत आहेत की वीज चोरांवर कारवाई करा. वीज चोरी होते ते कोण करतात हे देखील या जनतेच्या सेवकांना माहिती आहे. पण जो पर्यंत दामूनगर, आप्पापाडा सारखी घटना होणार नाही तोपर्यंत या जनतेच्या सेवकांना जाग येणार नाही असच वाटत आहे. म्हणून वीज चोरांवर, पाणी चोरांवर नक्की कारवाई झाली पाहिजेच पण…
पण त्यांच्यावर कारवाई करायच्या आधी प्रत्येक घरात हक्काचे वीज मिटर तेही जे भाडं सर्व पक्या घरांना आकारल जातं, प्रत्येक घरात पाण्याचे नळ, आणि या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना अंधारातसुद्धा नीट चालता येईल असे रस्ते बनवून देण्यात यावे. स्थानिकांना आपल्या अधिकारासाठी मोर्चा घेऊन यावं लागेल असं स्थानिकांचे म्हणणे आहे. काऱण जनतेचे सेवक हे फक्त मतदाना पुरतेच आहेत. आपल्याला आश्वासने देतात आणि मतदान झाले की आमच्याकडे आणि आमच्या प्रश्नांकडे ढुंकून देखील बघत नाहीत…!!




