“26 नोव्हेंबर” या चित्रपटाच्या निमित्ताने पटकथा आणि संवाद लेखक संतोष मोरे यांची छोटीशी मुलाखत…!!


मुंबई : “26 नोव्हेंबर” या चित्रपटाच्या निम्मिताने पटकथा आणि संवाद लेखक संतोष मोरे यांची निर्भीड समाचार चे कार्यकारी संपादक विजय उत्तमबाई कांबळे यांनी घेतलेली एक छोटीशी मुलाखत…!!

विजय : संतोष मोरे सर्वप्रथम तुला माझ्या आणि निर्भीड समाचारच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. तुझ्या पहिल्या मराठी चित्रपटाचे पदार्पन हे “26 नोव्हेंबर या चित्रपटापासून होत आहे.

विजय : तर संतोष तुला कसं वाटतंय आज तुझा हा पहिला चित्रपट प्रदर्शित झालाय तेही संपूर्ण महाराष्ट्रभर…!!

संतोष : मी खुप आनंदी आहे की जवळ जवळ 2 वर्षांनी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच मी पटकथा आणि संवाद लिहिले आहे.
मी माझ्या मित्र परिवारा सोबत माझ्या कुटुंबाला घेऊन या चित्रपटाच प्रीमियर शो पाहिले.
या वेळी मित्रांना आणि घरच्यांना सुद्धा चित्रपटातील कलाकारांना जे आजवर टीव्हीवर येणाऱ्या चित्रपटात बघत होते ते त्यांना प्रत्यक्ष बघता आणि भेटता आलं त्यामुळे तेही आनंदी होते आणि मी सुद्धा द्विगुणित आनंदी झालो की घरच्यांना सुद्धा काहीतरी नवीन अनुभव दिला.

विजय : बर तर संतोष तूझ थिएटरच शिक्षण कोणत्या विद्यापीठातुन केलंस कारण चित्रपट लिहणं, दिग्दर्शन करण या गोष्टी तर अकॅडमीकली शिकाव्या लागतात म्हणजे मुंबई विद्यापीठातून किंवा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (दिल्ली) तर तू नेमका कुठे शिकलास?

संतोष : याचं मला दुःख वाटतं की मला चित्रपट किंवा नाटक लिहिण्याच अकॅडमिक शिक्षण घेता आलं नाही. मी माझं शिक्षण एम ए (इतिहास) केलं आहे.

विजय : वाव, ही तर फारच इंटरेस्टिंग गोष्ट आहे की तू थिएटर मधुन ना पदवी ना उच्चपदवी घेतली आणि तरीही एवढं चांगलं लिहितोस जबरदस्त…!!

संतोष : मी चांगलं लीहातो की वाईट हे मला माहिती नाही पण लिहितोय.

विजय : मग मला सांग तुला नेमकं या सर्व गोष्टीची आवड कधी लागली?

संतोष : तस सांगायचं झालं तर मला पहिली पासूनच नाटकाची आवड निर्माण झाली कारण मी ज्या शाळेत शिकलो ती शाळाचं मुळी लहान मुलांना चित्रपट, नाटक दाखवायचे, शाळेतल्या मुलांना नाटकात भाग घ्यायला लावायचे आणि शालेय अंतर स्पर्धेत पाठवायचे.त्यामुळे माझ्या घडण्यात “एक्सर तळेपाखाडी मराठी शाळा, बोरिवली (पश्चिम)” या शाळेचा खुप मोठ योगदान आहे. आणि गंम्मत म्हणजे ही महानगर पालिकेची शाळा आणि त्यातही मराठी शाळा होती. त्यामुळे मराठी शाळा आणि महानगर पालिकेच्या शाळांचा तिरस्कार करणाऱ्या, त्या बंद पाडू पाहणाऱ्यां नागरिकांना आणि राजकारण्यांना मोठं उत्तर काय असू शकत. आणि महत्वाचं म्हणजे तू स्वतः निर्भीड समाचारचा कार्यकारी संपादक, जे तुही तुझं प्राथमिक शिक्षण महानगर पालिकेच्याच शाळेत घेतलंस.

विजय : हो संतोष हे अगदी खरं आहे मी सुद्धा महानगर पालिकेच्याच शाळेत शिकलो आणि मला सुद्धा लिहिण्याची आवड तिथूनच लागली.

विजय : तुला लहानपणापासून नाटक करण्याची आणि लिहिण्याची एवढी आवड होती मग तू आजवर एकही नाटक लिहिलं नाहीस किंवा एकही कमर्सिल नाटक केलं नाहीस याच कारण काय?

संतोष : आपल्याकडे नाटकाला खुप कमी लेखल जात. आपल्याकडे जी प्रसार माध्यमे आहेत त्यात टीव्हीकडेच लोकांचा ओढा जास्त आहे. मी एक व्यावसायिक नाटक लिहिलं आणि जेव्हा ते बसवण्यासाठी कलाकार शोधत फिरलो ज्यात काही मित्र सुद्धा होते पण त्यांना नाटकात जास्त रस नव्हता. त्यामुळे मला पुढे जात नाटकात काही करता आले नाही. मग पुढे मी नाटकासाठी खास आधीचे कॉलेज सोडून रुपारेल आणि साठे कॉलेजला गेलो. माझ्या अभिनयाची खुप कौतुक व्हायचं. पण मी शिवराय, फुले, शाहू आंबेडकर विचारांचा असल्यामुळे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारा निधर्मी असल्यामुळे दुटप्पी वागणूक मिळाली. त्यासोबतच कौटुंबिक अडचणीमुळे इच्छा नसताना, नाईलाजाने काढता पाय घ्यावा लागला.

विजय : कौटुंबिक अडचण म्हणजे नेमकं काय झालं?

संतोष : आपल्याकडे काय होतं विजय माहित आहे का? गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलांच्या गुणांचं पहिली पासून ते कॉलेज पर्यंत पालक खूप कौतुक करतात. पण जसा तो मोठा होतो त्याची बारावी झाली की त्याने कुठेतरी काम करावं, कुटुंबाला हातभार लावावा असं प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. पण आपल्यातल्या अभिनेत्याला जिवंत ठेवण्यासाठी आपण कुटुंबाच्या विरुद्ध संघर्ष करणं चालू करतो. त्यात कुटुंबियांची खूप ओढाताण होत असते यात काही शंका नाही. मी सुद्धा आईची आर्थिक परिस्थिती दूर न करता अभिनयात काहीतरी नाव मिळवावं म्हणून नाटकासाठी संघर्ष करत राहीलो. पण घरची परिस्थिती बघत होतो. आपल्या अभिनयाने आपल्या लेखनाने या समस्या सुटतील असं मला वाटत होतं. आणि मी घरच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अभिनय क्षेत्राकडे अभिनय क्षेत्रात यश मिळण्यासाठी धडपडत होतो. एकदा काय झालं माझी आई आजारी पडली. तिला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं. हॉस्पिटल मधून आईला घरी घेऊन जायला निघालो तर हॉस्पिटलच 50 हजार बील झालं होतं ते भरा तरच तुम्हाला डिस्चार्ज मीळेल. तेव्हा मला खूप वाईट वाटलं आणि अभिनयाला मी राम राम ठोकला. शाळा कॉलेजात मी सुरुवातीपासूनच खूप हुशार होतो त्यामुळे मी पाचवी ते बारावी पर्यंतच्या मुलांचं ट्युशन घ्यायला चालू केल. काही ठिकाणी काम सुद्धा केली. अगदी ऑफिसमध्ये झाडू मारण्यापासून ते मोठ्या कंपनीमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून पण काम केलं.
पण माझ्यातला कलाकार लेखक मला स्वस्थ बसू देत नव्हता. तब्बल दहा वर्षांनी मी परत अभिनयाकडे वळलो. ज्याचे श्रेय मी आमचे नाट्य कलाकार अभिनेते लेखक दिग्दर्शक असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे संदेश गायकवाड सर यांच्या प्रेरणेमुळे मी परत त्यांच्यासोबत पथनाट्य आणि काही एकांकिका करण्यास सुरुवात केली. पण जे मुलांचे मी क्लासेस घेत होतो ते मात्र बंद केले नाही. कारण माझ्या उपजीविकेचे साधन तेच होतं.

विजय : मग तु या सिने क्षेत्राकडे कधी आणि कसा वळलास?

Advertisement

संतोष : खरं म्हणजे सिने क्षेत्राकडे असलेला माझा ओढा लहानपणापासूनच होता. त्यामुळे सिनेमातल्या लोकांना जर कोणी आवढला तर ते सिनेमात काम द्यायचे. म्हणून मी नववीला असताना अभिनयाची संधी मिळेल या आशेने कांदिवली ते जुहूला चालत गेलो. कारण जुहूला अमिताभ बच्चनचा बंगला आहे हे ऐकलं होतं. पण मी तिथे जावून भांबावलो मला कळालंच नाही की अमिताभ बच्चनचा बंगाल कोणता. पण तिथे भटकत असताना जतिन कनाकिया श्रीमान श्रीमती फेम आणि राकेश बेदी यांची एका स्टुडिओमध्ये शूटिंग चालू होती. पण माझी हिम्मत स्टुडिओच्या आत जाण्याची झाली नाही. मी रात्रभर स्टुडिओच्या बाहेर बसलो आणि सकाळी गपचूप घरी आलो. पाचवीत असताना मी युसुफ परवेज यांना भेटलो त्यांना माझा अभिनय आवडला त्यांनी मला मुकेश खन्नाकडे पाठवलं शक्तिमान सिरीयलच्या शूटिंगला गेलो. मला वाटलं मला मस्त रोल मिळेल अभिनय करण्याची संधी मिळेल. पण मला स्वतःला लोकांच्या गर्दीत उभं राहायला सांगितलं. मला चांगला रोल न मिळता गर्दीत उभं केल्याचं वाईट वाटलं आणि दुपारी पळून गेलो. पुढे सुदैवाने डायरेक्टर सुजित कुलकर्णी यांच्याशी भेट झाली आणि मला त्यांचा असिस्टंट म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळेच “शांताराम वेडा झाला” हा अल्बम करता आला. “रीना चौहान” यांच्या “स्वॅग एंटरटेनमेंट प्रोडकशन हाऊस “ मध्ये दंगल चैनलवरच्या “सावधान इंडिया” या सिरीयल मध्ये असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. अनेक हिंदी वेब सिरीजचं आणि सिनेमाचं पटकथा लेखन मी केलंय पण ते प्रदर्शित झाले नाही.

विजय : मग तूला 26 नोव्हेंबर हा सिनेमा लिहायला कसा मिळाला?

संतोष : 2017 च्या आसपास मराठी चित्रपट महामंडळला माझी आणि सचिन उराडे सरांची भेट झाली. आणि सहज बोलता बोलता त्यांच्याशी गट्टी जमली. नागपूरचे एक निर्माता, दिग्दर्शक, आणि अभिनेता म्हणून नागपूरचे सचिन सर सर्वांच्या परिचयाचे आहेत. त्यांच्याशी माझे वैचारिक नाते जुडले. ते नागपूरचे आणि मी मुंबईचा तरीसुद्धा आमचं मध्ये मध्ये अनेक विषयांवर चर्चा होत असत. ते मला नेहमी म्हणायचे आपण एकत्र काम करू. आणि त्यांनी 2022 मध्ये त्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि 26 नोव्हेंबर च्या चित्रपटासाठी त्यांचा सहायक म्हणून काम करण्याची संधी देऊ केली. त्याच दरम्यान त्यांना कळाल की मी पटकथा आणि संवाद लिहितो. त्यामुळे त्यांनी मला त्यांच्या चित्रपटासाठी पटकथा आणि संवाद लिहण्याची संधी दिली. अर्थातच अनेक वैचारिक वाद संवाद करत आम्ही मिळून याची पटकथा आणि संवाद लिहिले. यापूर्वी मी खूप लिखाण केलं आहे जे कधीच प्रदर्शित झाल नाही. त्यामुळे आज मला 26 नोव्हेंबर या चित्रपटाच्या निमित्ताने मिळणारे मान सन्मान ही त्यांचीच देणगी आहे. त्यासाठी त्याचं जितकं आभार मानावे तितकं कमीच आहे.

विजय : यापुढे तुझे तुझे नवीन प्रोजेक्ट आहेत का?
किंवा या चित्रपटानंतर पुढे काय करणार आहेस?

संतोष : दोन बॉलिवूड मुव्हीज आहेत. एक मराठी मुव्हीज आहे. दोन वेबसरीज आहेत . यात के के मेनन, आशिष विद्यार्थी, आशुतोष राणा अशी बरीच तगडी कास्ट आहेत. एका निर्मात्याने मला फिल्म डायरेक्ट करायची संधी देऊ केली, मी त्यांना म्हणालो सर अजून मला खूप शिकायचं आहे. मला वाटतं एक डायरेक्टर साठी फिल्म डायरेक्ट करन खूप सोप काम आहे. खरं काम आहे कमीत कमी बजेट मध्ये उत्तम चित्रपट बनवणं. लोकांपर्यंत पोहोचवणं सर्व थरातील वयातील लोकांचं मनोरंजन करणं आणि निर्मात्याला प्रचंड फायदा मिळवून देऊन पुढच्या चित्रपट निर्मितीसाठी आत्मविश्वासाने त्याला उभ करण हेच उत्तम डायरेक्टच काम आहे. म्हणजे सगळा खेळ पैशाचा आहे. मनोरंजन सामाजिक संदेश आणि त्याचबरोबर बॉक्स ऑफिसवर प्रचंड गर्दी आपण निर्माण करू शकतो असा विश्वास ज्या डायरेक्टरला वाटत तोच खरा डायरेक्टर आणि हेच तंत्र मला अजून शिकायचं आहे. स्टोरी काय असावी, संवाद काय असावे , सीन, अँगल्स, हे तर रिल्स करणाऱ्या सर्व तरुणांना माहित आहेच अस मला वाटत. जो लोकांची गर्दी खेचू शकतो आणि लावलेला पैसे मोठ्या प्रमाणात मिळवू शकतो तोच खरा डायरेक्टर. यावर बराच वाद विवाद होऊ शकतो . पण हे माझं प्रांजळ मत आहे.

विजय : या फिल्मी क्षेत्रात येणाऱ्या तरुणांना काय संदेश देशील?

संतोष : अरे बापरे, मी स्वतः अजून तरुणच आहे. मी फार मोठा लेखक अभिनेता वगैरे नाही आहे आणि तरुणांना मी काय संदेश देणार . आजचे तरुण खूप हुशार आणि स्मार्ट आहेत. त्यांच्याकडूनच मला भरपूर काही शिकायला मिळत. मी तरुण लेखक कलाकार तंत्रज्ञ याचा खूप चाहता आहे. तरुण मुले मुली खूप भयानक आहेत. कामाप्रती त्याचं खूप डेडिकेशन आहे. खूप सुंदर काम करतात आजची तरुण मुलं. त्यांना माहित आहे हे क्षेत्र कस काबीज करायचं आणि कस जिंकायचं.

विजय : खरंच संतोष आज तूझ्या “26 नोव्हेंबर” या पदार्पण चित्रपटच्या निम्मिताने बऱ्याच गोष्टी मला सुद्धा नव्याने कळल्या. तुझी या फिल्मी क्षेत्रात येण्याची आवड, त्यासाठी तू लहानपणापासून केलेली धडपड, इथेपर्यंत येण्यासाठी पाहिलेले चढ उतार आणि शेवटी आज ते सार काही तूला मिळताना पाहतोय. या साऱ्या प्रवासाचा कमी अधिक प्रमाणात मीही तुझा साक्षीदार आहे.

विजय : मला जाता जाता एकच शेवटचा प्रश्न विचारायचा आहे.
तो म्हणजे “26 नोव्हेंबर” चित्रपट लोकांनी का बघावा या बद्दल तू लेखक म्हणून लोकांना काय सांगशील?

संतोष : चित्रपटाच्या नावाप्रमाणे हा चित्रपट संविधानाची संबंधित आहे हे तर आपल्याला कळतंच. त्याचबरोबर आज विविधतेने नटलेल्या या देशात जातीय, धार्मिक, भाषिक आणि प्रांतीय तेढ निर्माण करण्याचा व विषमतेचे विष पेरण्याचा प्रयत्न होतोय. त्याचमुळे सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारा, समता,बंधुता, मानवता प्रस्थापित करू पाहणारा आमच्या चित्रपटाचा नायक कोण्या एका जातीचा नसून तो शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित आहे. शासकीय अधिकारी असूनही सत्ताधारी पक्ष्याच्या नेत्यांनीच समाजात अन्याय माजवला आहे त्या अन्यायाविरुद्ध बंड पुकारतो. प्रेयसी, आई, वडील, बहीण, आणि आपल पद यांचा विचार न करता जुलमी व्यवस्थेशी संघर्ष करतो आणि सर्व थरातील लोकांना संविधानिक मूल्यांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतो. यासोबतच दमदार अभिनय, उत्तम संगीत, श्रवणीय गाणे, उत्तम संवाद यासाठी हा चित्रपट प्रेक्षकांनी सिनेमागृहात जाऊन नक्की बघावं.

विजय: खुप मज्जा आली तुझी मुलाखत घेताना आणि मुलाखतीच्या शेवटी एकच म्हणावंसं वाटतंय आणि ते म्हणजे एक फिल्मी डायलॉग जो खरंच मनापासून मिळवण्यासाठी जे सर्वकाही चढउतार बघत आशावादी जगतात हे त्यांच्यासाठी सुद्धा लागू होतं आणि ते म्हणजे…

“केहते हैं अगर किसी चीज को दिल से चाहो…!
तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती हैं…!!

पिच्चर अभी बाकी हैं मेरे दोस्त…!!

खरंच तुझे आणि “26 नोव्हेंबर” चित्रपटाचे कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि संपूर्ण टीमचे पुनःशा मनपूर्वक अभिनंदन आणि तूझ्या येणाऱ्या पुढील अनेक चित्रपट, वेब सिरीज, सिरीयल, नाटक यांचा तू लेखक, पटकथा लेखक, संवाद लेखक, दिग्दर्शक आणि त्या सोबतच एक उत्तम कलाकार म्हणून सुद्धा झालेला मला पाहता यावं याचं तूला पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून आणि “निर्भीड समाचार” च्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!!


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Milind jadhav sir Anudatta vidyalaya kandivali East
1 year ago

Very good interview vajay ani santosh ni reply Chan dili Santosh la pudhacha कार्यासाठी शुभेछा

Translate »
error: Content is protected !!
1
0
Would love your thoughts, please comment.x
()
x