मुंबईत या तारखेपासून पाणी कपात
मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये केवळ १० टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने ३० मे पासून ५ टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.
पाणी साठा शक्य तितक्या काळ टिकेल याची खबरदारी म्हणून ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू करणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. त्यात ठाणे महापालिका आणि भिवंडी निजामपुरा महापालिकेला पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याचाही समावेश असणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये १,४०,२०२ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध आहे आणि १४,४७,३६३ दशलक्ष लिटरच्या वार्षिक गरजेच्या हे केवळ ९.६९ टक्के आहे.
शहरात ३१ जुलैपर्यंत पाणीसाठा पुरेल अशा पद्धतीने पुरवठ्याचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासन पाण्याच्या साठ्यावर बारीक लक्ष ठेवून आहे आणि दररोज नियोजनबद्ध पद्धतीने पाणीपुरवठा करत असल्याचे प्रशासनाने सांगितलेआहे. जोपर्यंत पुरेसा पाऊस पडत नाही आणि जलसाठ्यातील उपयुक्त साठा सुधारत नाही तोपर्यंत पाणीकपात सुरूच राहणार आहे.
BMC प्रशासन सर्व नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करत आहे. बीएमसीने वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुणे आणि शॉवर टाळणे यासारख्या सूचना दिल्या आहेत, तर रेस्टॉरंट्सना गरज असेल तेव्हाच पाणी देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.





