नसरापूरच्या नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी! न्यायालयाचा निकाल


मुंबई : निर्भीड समाचार वृत्तसेवा

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार आणि निर्घृण हत्या प्रकरणाचा अंतिम निकाल पुणे विशेष न्यायालयाने २९ जून २०२६ रोजी सुनावला आहे. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या या गुन्ह्यातील ६५ वर्षीय पाषाणहृदयी नराधम आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे याला विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी ‘मरेपर्यंत फाशी’ची कठोर शिक्षा सुनावली आहे. हा खटला राज्याच्या न्यायिक इतिहासात मैलाचा दगड ठरला असून, १ मे २०२६ रोजी घडलेल्या या घटनेत अवघ्या ५८ दिवसांत संपूर्ण सुनावणी पूर्ण करून न्यायालयाने निकाल जाहीर केला. निकाल ऐकताच पीडित मुलीच्या पालकांच्या भावनांचा बांध फुटला आणि त्यांनी न्यायालयाचे आभार मानले.

“हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ”; निकाल देताना विशेष न्यायाधीश काय म्हणाले?
न्यायालयाने आपला अंतिम ऐतिहासिक निर्णय वाचन करताना आरोपीच्या कृत्यावर तीव्र शब्दांत ओढारे ओढले. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी निकालपत्रात नोंदवलेले महत्त्वाचे निरीक्षणे खालीलप्रमाणे आहेत:

1. फाशीची शिक्षा देखील पुरेशी ठरणार नाही: “आरोपीने केलेले कृत्य अत्यंत घृणास्पद, अमानुष आणि क्रूरतेची पराकाष्ठा करणारे आहे. अशा नराधमाला आजन्म कारावासाची (जन्मठेप) शिक्षा अत्यंत अपुरी आहे. वस्तुतः अशा कृत्यासाठी फाशीची शिक्षा देखील कमी पडेल, इतकी क्रूरता यात दिसून येते.”

2. ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ (Rarest of Rare) घटना: “या गुन्ह्याचे स्वरूप, त्यामागील हेतू आणि गुन्ह्याची भीषणता लक्षात घेता, हा खटला सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निकषांनुसार ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ या वर्गात मोडतो. त्यामुळे समाजात अशा विकृत प्रवृत्तींना जरब बसवण्यासाठी मृत्युदंडाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही.”

3. पालकांच्या भावनांची जाणीव आणि सामाजिक विवेक: “आपल्या लाडक्या निष्पाप मुलीला न्याय मिळावा यासाठी तळमळणाऱ्या पालकांच्या वेदना आणि भावनांची न्यायालयाला पूर्ण जाणीव आहे. या घटनेमुळे केवळ पीडित कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण सामाजिक आणि न्यायिक विवेक ढवळून निघाला आहे. समाजात योग्य संदेश जाण्यासाठी कायद्याचा कठोर प्रहार आवश्यक आहे.”

Advertisement

4. गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि पूर्वनियोजित कट: “आरोपीचा पूर्वेतिहास पाहता तो सराईत गुन्हेगार असून त्याला कायद्याची किंवा कशाचीही भीती उरलेली नव्हती. स्वतःची वासना शमवण्यासाठी त्याने साडेतीन वर्षांच्या बालिकेला खाऊचे आणि वासराचे आमिष दाखवून गोठ्यात नेले. हे कृत्य पूर्णपणे विचारपूर्वक आणि थंड डोक्याने रचलेला कट होता.”

५८ दिवसांत न्याय; पोलिसांचे आणि विशेष सरकारी वकिलांचे यश
१ मे २०२६ रोजी (महाराष्ट्र दिनी) नसरापूर परिसरातून ही चिमुरडी अचानक बेपत्ता झाली होती. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी भीमराव कांबळेला अटक केली. त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार करून गळा दाबून तिची हत्या केली व मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्यात लपवला होता. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल आणि तपास यंत्रणेने अवघ्या १५ दिवसांत १२०० पानांचे मजबूत आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. २१ मे पासून विशेष न्यायालयात दैनंदिन (Fast-track) सुनावणी सुरू झाली. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी ५० हून अधिक साक्षीदार आणि भक्कम शास्त्रीय पुरावे (DNA अहवाल) कोर्टासमोर मांडून आरोपीची क्रूरता सिद्ध केली. २५ जून रोजी त्याला दोषी ठरवून २९ जून रोजी फाशीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

“शिक्षेची अंमलबजावणी होईल तेव्हाच पूर्ण समाधान” — पीडितेचे कुटुंब
न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावताच पीडित चिमुरडीच्या आई-वडिलांना न्यायालयातच रडू कोसळले. कोर्टाबाहेर माध्यमांशी बोलताना मुलीच्या वडिलांनी अत्यंत भावनिक प्रतिक्रिया दिली:

“आम्ही न्यायालयाच्या या निर्णयावर समाधानी आहोत. आमच्या लाडक्या लेकीला अखेर न्याय मिळाला. पहिल्या दिवसापासून संपूर्ण समाजाने या नराधमासाठी केवळ फाशीचीच मागणी केली होती. आमची ही मागणी आज कोर्टाने मान्य केली आहे. मात्र, आमचे खरे समाधान आणि आमच्या आत्म्याला शांती तेव्हाच लाभेल, जेव्हा या नराधम भीमराव कांबळेच्या फाशीच्या आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून त्याला फासावर लटकवले जाईल.”

या प्रकरणाच्या जलद निकालाचे मुख्यमंत्री आणि राजकीय नेत्यांनी कौतुक केले असून, महाराष्ट्रात महिला व बाल सुरक्षेसाठी कायदा किती कठोर आहे, हे या निकालाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x