जमीन विकून पत्नीला बनवले BPSC शिक्षिका; नोकरी मिळताच पतीला सोडले!
मुंबई/बिहार : निर्भीड समाचार वृत्तसेवा
बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील हाजीपूर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ‘पती, पत्नी आणि वो’ या त्रिकोणी प्रेमाचा एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पाहून अनेकांना काही महिन्यांपूर्वी देशभरात गाजलेल्या उत्तर प्रदेशातील ‘ज्योती मौर्य’ प्रकरणाची आठवण झाली आहे. एका गरीब पतीने स्वतः रक्ताचे पाणी करून, मजुरी करून आणि हक्काची वडिलोपार्जित जमीन विकून आपल्या पत्नीला शिकवले. तिला बिहार लोकसेवा आयोगाच्या (BPSC) परीक्षेत यश मिळवून देऊन शिक्षिका बनवले. मात्र, शिक्षिका होताच पत्नीने अवघ्या काही दिवसांतच रंग बदलले आणि पोटच्या १० वर्षांच्या मुलासह पतीला वाऱ्यावर सोडून ती आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याचा गंभीर आरोप पतीने केला आहे.४६ वर्षीय पीडित पती अमन कुमार यांनी आपली शिक्षिका पत्नी गुंजन कुमारी हिच्याविरोधात पोलिसांत धाव घेत न्याय मागितला आहे. या घटनेची सध्या संपूर्ण बिहारसह देशभरात मोठी चर्चा सुरू आहे.
मजुरी केली, जमीन विकली; पण पत्नीचे स्वप्न पूर्ण केले
अमन कुमार आणि गुंजन कुमारी यांचा विवाह २०१३ मध्ये झाला होता. लग्नाच्या वेळी गुंजन ही केवळ इंटरमीडिएट (बारावी) पास होती. तिची पुढे शिकण्याची आणि शिक्षिका बनण्याची तीव्र इच्छा होती. अमन यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. ते स्वतः मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. परंतु, पत्नीची शिकण्याची जिद्द पाहून त्यांनी गरिबी आड येऊ दिली नाही.अमन यांनी स्वतः उपाशी राहून पत्नीच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलला. जेव्हा पैशांची चणचण भासू लागली, तेव्हा त्यांनी मागे-पुढे न पाहता आपली वडिलोपार्जित पैतृक जमीन सुद्धा विकून टाकली. या पैशांमधून त्यांनी गुंजनचे उच्च शिक्षण पूर्ण केले आणि तिला स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या. दोन्ही पती-पत्नीला १० वर्षांचा एक मुलगाही आहे.
BPSC परीक्षेत यश अन् नशिबाने घेतला यु-टर्न
पतीच्या अथांग कष्टामुळे गुंजनने बिहार लोकसेवा आयोगाची (BPSC) शिक्षिका भरती परीक्षा उत्तीर्ण केली. तिची शिक्षिका म्हणून निवड झाल्यानंतर अमन यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. आपल्या कष्टाचे चीज झाले आणि आता कुटुंबाचे गरिबीचे दिवस संपणार, अशी आशा अमन यांना होती. गुंजनची नियुक्ती वैशाली जिल्ह्यातीलच एका शासकीय शाळेत झाली. मात्र, नोकरी मिळाल्यानंतर काही दिवसांतच गुंजनच्या वागण्यात अचानक मोठा बदल होऊ लागला.
‘त्या’ तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री आणि कुटुंब उद्ध्वस्त
पती अमन कुमार यांनी लावलेल्या आरोपानुसार, शिक्षिका बनल्यानंतर गुंजनचे एका दुसऱ्या पुरुषासोबत प्रेमसंबंध सुरू झाले. ती तासनतास फोनवर व्यस्त राहू लागली आणि पती व मुलाकडे दुर्लक्ष करू लागली. अमन यांनी जेव्हा या गोष्टीला विरोध केला, तेव्हा तिने थेट त्यांच्यासोबत राहण्यास नकार दिला.नोकरीची पहिली पगार हातात येताच आणि पायावर उभे राहताच गुंजनने ज्या पतीने तिला इथपर्यंत पोहोचवले, त्यालाच लाथ मारली. ती आपल्या १० वर्षांच्या निष्पाप मुलाला आणि पतीला सोडून आपल्या प्रियकरासोबत निघून गेली.
पीडित पतीचा पोलीस ठाण्यात टाहो
हताश आणि हतबल झालेले अमन कुमार आपल्या १० वर्षांच्या मुलाला कडेवर घेऊन हाजीपूर नगर पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांसमोर आपली व्यथा मांडताना अमन यांना आपले अश्रू अनावर झाले होते. त्यांनी सांगितले, “मी तिला पोटच्या गोळ्यासारखं जपलं, स्वतः मजुरी केली, जमीन विकून तिला शिक्षिका बनवलं. पण आज तिने मला आणि आमच्या मुलाला रस्त्यावर आणून सोडलं. मला केवळ माझा मुलगा आणि माझी विकलेली जमीन परत हवी आहे.”पतीच्या या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. कौटुंबिक वाद आणि प्रेमप्रकरणाचा हा अँगल असल्याने पोलीस दोन्ही बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
सोशल मीडियावर ‘दुसरे ज्योती मौर्य प्रकरण’ म्हणून चर्चा
या घटनेची माहिती समोर येताच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अनेक युजर्स या प्रकरणाची तुलना उत्तर प्रदेशातील बहुचर्चित ‘ज्योती मौर्य आणि आलोक मौर्य’ प्रकरणाशी करत आहेत. “अशा घटनांमुळे समाजात प्रामाणिक पतींचा महिलांच्या शिक्षणावरील विश्वास उडेल,” अशी भीती अनेकांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे, एका व्यक्तीच्या चुकीमुळे सर्व नोकरदार महिलांना एकाच तराजूत तोलू नये, असा सूरही काही स्तरातून उमटत आहे.या प्रकरणात आता पोलीस काय कारवाई करतात आणि पीडित पतीला न्याय मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





