राजन विचारेंचा मोठा दावा

ठाण्याचा लोकसभा मतदारसंघ सध्या चर्चेत आला आहे. ठाण्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातून ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर नरेश म्हस्के यांच्या विरोधात ठाकरे गटाचे राजन विचारे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
राजन विचारे सातत्याने शिंदे गटावर निशाणा साधत आहेत. त्यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन नरेश म्हस्केंबाबत मोठा गोप्यस्फोट केला होता. आता त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत.
शिंदे हे २०१३ मध्येच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. स्वत:सह मिळून पाच आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, असा दावा महाविकास आघाडीचे ठाण्याचे उमेदवार राजन विचारे यांनी केला आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
एकनाथ शिंदे हे २०१३ सालीच बंडखोरी करणार होते. त्यांना तेव्हाच शिवसेना संपवायची होती. तुम्ही किती पक्ष वाढवला? जिल्ह्यात किती आमदार होते? याला फोड, त्याला फोड, कुठला पक्ष सोडलात सांगा?, अशा शब्दात राजन विचारे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
इतकंच नाही तर, एकनाथ शिंदे २०१३ मध्येच चार आमदारांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. मात्र त्यावेळी आम्ही काँग्रेसच्या तिकीटावर कसे निवडून येणार? असं चार आमदारांनी विचारलं, त्यामुळे एकनाथ शिंदे यांची रणनीती फसली, असा मोठा गौप्यस्फोटही राजन विचारे यांनी केला.
अशातच काँग्रेस नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा राजन विचारे यांच्या आरोपांना पाठिंबा दिला आहे. २०१३ साली एकनाथ शिंदे पाच आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. मी असं ऐकलं होतं असं विजय वेडट्टीवार म्हणाले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.




