ई-फार्मसीविरोधात देशात लाखों मेडिकल स्टोअर्स बंद; रुग्णांचे हाल!
मुंबई/नवी दिल्ली : निर्भीड समाचार वृत्तसेवा
देशभरातील औषध विक्रेत्यांची शिखर संघटना असलेल्या ‘ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स’ (AIOCD) च्या आवाहनानुसार २० मे रोजी देशात ऐतिहासिक राष्ट्रव्यापी संप पुकारण्यात आला. ऑनलाईन ई-फार्मसी आणि काही मिनिटांत औषध पोहचवणाऱ्या ‘इन्स्टंट मेडिसिन डिलिव्हरी ॲप्स’च्या मनमानी कारभाराविरोधात देशभरातील औषध दुकानांना कुलूप ठोकण्यात आले होते. या देशव्यापी बंदचा थेट फटका मुंबई, दिल्ली, कोलकाता, पाटणा आणि जयपूरसह देशातील सर्वच प्रमुख शहरांना बसला. लाखों मेडिकल स्टोअर्स या आंदोलनात सक्रिय सहभागी झाल्यामुळे औषध खरेदीसाठी आलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
ऑनलाइन कंपन्यांच्या मनमानी कारभारावर केमिस्ट संघटनांचा आक्षेप
एआयओसीडी (AIOCD) आणि स्थानिक केमिस्ट संघटनांचा मुख्य आक्षेप देशात फोफावत चाललेल्या ई-फार्मसी आणि जलद डिलिव्हरी देणाऱ्या ॲप्सवर आहे. संघटनांच्या नेत्यांनी आरोप केला आहे कि, हे ऑनलाईन ॲप्स कोणत्याही ठोस नियमावलीशिवाय आणि कायद्याचे उल्लंघन करून औषध व्यवसाय करत आहेत. मोठ्या कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या अवाजवी सवलतींमुळे (Discounts) गल्लीबोळातील पारंपरिक आणि छोटे मेडिकल स्टोअर्स उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. तसेच, ऑनलाईन माध्यमांतून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय (Prescription) आणि अंमली पदार्थांच्या श्रेणीत येणाऱ्या औषधांची सर्रास विक्री होण्याची भीती वाढली आहे, जी मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.
दिल्ली, मुंबईसह प्रमुख शहरांमध्ये कडकडीत बंद
या आंदोलनाचा सर्वाधिक प्रभाव महानगरांमध्ये पाहायला मिळाला. मुंबईत घाटकोपर, दादर, अंधेरी तसेच नवी मुंबई परिसरातील औषध दुकाने पूर्णपणे बंद होती. दिल्लीतील घाऊक औषध बाजार असलेली ‘भगीरथ पॅलेस’ बाजारपेठ पूर्णपणे ठप्प झाली होती. कोलकाता, पाटणा आणि जयपूरमध्येही केमिस्ट असोसिएशनने कडकडीत बंद पाळला. संघटनेच्या दाव्यानुसार, देशभरातील सुमारे ९ ते १० लाख औषध विक्रेते या एकदिवसीय लाक्षणिक संपामध्ये सहभागी झाले होते. केवळ रुग्णालयांच्या आवारातील इमर्जन्सी मेडिकल स्टोअर्स आणि २४ तास सेवा देणारी काही दुकाने अपवाद म्हणून सुरू ठेवण्यात आली होती.
रुग्णांची फरफट आणि प्रशासनाची धावपळ
अचानक पुकारण्यात आलेल्या या संपामुळे औषधांची तातडीने गरज असलेल्या सामान्य रुग्णांचे प्रचंड हाल झाले. अनेक ठिकाणी लोक औषधांसाठी एका दुकानातून दुसऱ्या दुकानात चकरा मारताना दिसले. विशेषतः मधुमेह, रक्तदाब आणि कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांची नियमित औषधे घेणाऱ्या नागरिकांना या बंदचा मोठा फटका बसला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून काही राज्यांच्या आरोग्य प्रशासनाने शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयांमधील औषध साठा वाढवला होता, मात्र तरीही मागणीच्या तुलनेत ही यंत्रणा अपुरी पडत असल्याचे चित्र होते.
‘नियम पाळा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करू’ – संघटनेचा इशारा
पारंपरिक केमिस्ट संघटनांनी केंद्र सरकारकडे थेट मागणी केली आहे की, जोपर्यंत ऑनलाईन औषध विक्रीसाठी कडक कायदे आणि नियमावली (Drugs and Cosmetics Rules) लागू केली जात नाही, तोपर्यंत या ॲप्सवर पूर्णपणे बंदी घालण्यात यावी. किरकोळ औषध विक्रेते देशातील आरोग्य व्यवस्थेचा कणा आहेत आणि त्यांच्या पोटावर मारणाऱ्या कॉर्पोरेट कंपन्यांना चाप लावणे गरजेचे आहे, अशी भूमिका औषध विक्रेत्यांनी घेतली आहे. जर सरकारने तातडीने यात हस्तक्षेप करून ठोस निर्णय घेतला नाही, तर आगामी काळात बेमुदत संप पुकारण्याचा इशाराही केमिस्ट संघटनेने दिला आहे.





