मुंबईत इडली-वडा खाणाऱ्यांनो सावधान; तुकाराम मुंढे अॅक्शन मोडमध्ये!


मुंबई : निर्भीड समाचार वृत्तसेवा

मुंबई म्हटली की लोकलची गर्दी, धावपळ आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेर किंवा नाक्यानाक्यावर मिळणारी गरमागरम ‘इडली, वडा आणि डोसा’ हे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. ऑफिसला जाणारे कर्मचारी असोत की कॉलेजचे विद्यार्थी, मुंबईकरांच्या सकाळच्या नाश्त्याची सुरुवात बहुतांश वेळा याच स्वस्त आणि मस्त दाक्षिणात्य खाद्यपदार्थांनी होते. मात्र, जर हाच आवडता नाश्ता तुमच्या आरोग्यासाठी ‘धीमा जहर’ ठरत असेल तर? हाच धक्कादायक खुलासा अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे नवे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला आहे. मुंबईकरांच्या आरोग्याशी चाललेली ही जीवघेणी तडजोड रोखण्यासाठी तुकाराम मुंढे आता पूर्णपणे ‘अॅक्शन मोड’मध्ये आले असून त्यांनी थेट अशा अस्वच्छ अन्न केंद्रांवर धडक कारवाईचे सत्र सुरू केले आहे. यामुळे मुंबईच्या रस्त्यांवरील इडली-वडा गायब होणार की काय, अशी भीती आता विक्रेत्यांमध्ये पसरली आहे.

धारावी आणि झोपडपट्ट्यांमधील धक्कादायक वास्तव समोर
मुंबईच्या रस्त्यांवर, गाड्यांवर आणि छोट्या उपहारगृहामध्ये विकले जाणारे बहुतांश इडली-वडे नेमके कुठे बनतात, याचा शोध ‘एफडीए’च्या विशेष पथकाने घेतला. या तपासादरम्यान अत्यंत हादरवून टाकणारी आणि भयानक माहिती समोर आली आहे. मुंबईत विकला जाणारा मोठा साठा हा धारावी किंवा इतर दाटीवाटीच्या झोपडपट्ट्यांमध्ये, अत्यंत अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त जागेत तयार केला जातो. कोणत्याही परवान्याशिवाय किंवा अन्न सुरक्षा मानकांचे पालन न करता, थेट जमिनीवर बसून, उघड्यावर आणि दूषित पाण्याचा वापर करून हे पदार्थ मोठ्या प्रमाणावर तयार केले जात असल्याचे छाप्यात उघड झाले आहे.

‘माहितीचा बोर्ड’ आणि ‘अन्न सुरक्षा’ न मानणाऱ्यांना दणका
काही दिवसांपूर्वीच हॉटेल्समध्ये मोफत पाणी देण्याचा ऐतिहासिक आदेश दिल्यानंतर, आयुक्त मुंढे यांनी आता आपला मोर्चा थेट स्ट्रीट फूड आणि नाश्त्याच्या केंद्रांकडे वळवला आहे. एफडीएने स्पष्ट केले आहे की, केवळ हॉटेल्सच नव्हे, तर रस्त्यावरील लहान-मोठे विक्रेते आणि अन्न तयार करणाऱ्या कारखान्यांनी ‘अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६’ (FSS Act 2006) चे काटेकोर पालन केले पाहिजे. जे व्यावसायिक अस्वच्छता ठेवतील, कचऱ्याच्या ढिगाऱ्याशेजारी अन्न शिजवतील किंवा निकृष्ट दर्जाचे तेल आणि साहित्य वापरतील, त्यांचे केंद्र थेट सील केले जाईल.

Advertisement

मुख्य त्रुटी ज्यांच्यावर एफडीएची नजर आहे:
1. पाण्याचा दर्जा: इडलीचे पीठ तयार करण्यासाठी आणि चटणीसाठी वापरण्यात येणारे पाणी शुद्ध आहे की नाही, याची तपासणी केली जात आहे.

2. वापरलेले तेल: वडा तळण्यासाठी एकदा वापरलेले खाद्यतेल वारंवार वापरण्यावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.

3. पॅकेजिंगचे नियम: इडली-वडा वर्तमानपत्राच्या (न्यूजपेपर) कागदावर किंवा प्लास्टिकच्या असुरक्षित पिशवीत देण्यास सक्त मनाई आहे.

लोकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही!
आपल्या डॅशिंग कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे आयएएस (IAS) अधिकारी तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, “आम्ही कोणाचाही रोजगार हिरावून घेण्याच्या बाजूने नाही. मात्र, रोजगाराच्या नावाखाली लाखो मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ करण्याची परवानगी कोणालाही दिली जाऊ शकत नाही. जर तुम्हाला खाद्यपदार्थ विकायचे असतील, तर तुम्हाला किमान स्वच्छता आणि कायदेशीर परवाना (License/Registration) बाळगणे बंधनकारक आहे. नियम न पाळणाऱ्या बेकायदेशीर केंद्रांवर केवळ दंडच होणार नाही, तर थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जातील.

खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले; ग्राहकांकडून स्वागततुकाराम मुंढे यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे मुंबईतील विशेषतः धारावी, मानखुर्द, आणि गोवंडी परिसरातील बेकायदेशीर इडली-वडा उत्पादकांचे धाबे दणाणले आहेत. अनेक ठिकाणी घाबरून विक्रेत्यांनी स्वच्छता राखण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे, सामान्य मुंबईकर आणि अन्नप्रेमींनी मात्र या मोहिमेचे मोठ्या उत्साहात स्वागत केले आहे. “आम्हाला स्वस्त नाश्ता नक्कीच हवा आहे, पण तो आरोग्याचा बळी देऊन नको,” अशी प्रतिक्रिया चाकरमान्यांनी दिली आहे.पुढील काही दिवसांत मुंबईच्या सर्व भागांत ‘एफडीए’चे पथक अचानक भेटी देऊन तपासणी करणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची दुकाने आणि गाड्या जप्त केल्या जाणार आहेत.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x