राजकारणी आहात कि गावगुंड, अंजली दमनीयांचा अजित पवारांना सवाल
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भाषेवरुन त्यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहे. अजित पवारांनी पुणे जिल्ह्यातील मतदारसंघात जाहीर सभा घेत काही नेत्यांना चांगलाच दम दिला होता. यावरून आता अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे.
आपण राजकारणी आहात की गावगुंड? असा सवालच दमानिया यांनी अजित पवारांना केला आहे.
काम चालू हवं असेल तर तुम्ही सुनेत्रा पवारला मदत करा. आधी इथपर्यंत ठीक होते पण आता रोज उठून धमक्या मिळत आहेत, ते निलेश लंके असो अशोक पवार असो, अमोल कोल्हे असो, किंवा बजरंग सोनवणे असो प्रत्येकाला तुला बघून घेतो, तुला धडा शिकवतो ही जी भाषा आहे ती काय आहे? असा सवाल अंजली दमानिया यांनी विचारला आहे.
एखाद्या व्यक्तीची लोकप्रियता कमी झाली कि तो असे वागायला लागतो. अजित पवारांकडे जर आपण बघितलं तर लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर रोज वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या ते देत आहेत, असंही दमानिया यांनी म्हटलं आहे.
आता अजित पवारांना जाणवत आहे की, त्यांची जी लोकप्रियता होती, ती आता कमी झाली आहे. आता, त्यांनाच नाही, तर त्यांच्या उमेदवारांनासुद्धा महाराष्ट्रात येणारी नवीन निवडणूक अतिशय जड जाणार असल्याचं दमानिया यांनी म्हटलंय.
दरम्यान, अजित पवारांच्या या दमबाजीवरुन आता त्यांच्यावर टीका होत आहे. आमदार रोहित पवार आणि सुनिल केदार यांनी देखील अजित पवारांच्या भाषणावरुन त्यांच्यावर पलटवार केला होता.





